हाडे खिळखिळी करणारा आशियाई महामार्ग: सातारा पुणे महामार्गावरील सेवा रस्ते खड्डयात
खड्ड्यात गाडी की गाडी पाण्यात..गाडीची बोंबाबोंब..!अपघातांची संख्या वाढली, वाहने झाली खिळखिळी
30 May, 2025
*खड्ड्यात गाडी की गाडी पाण्यात..गाडीची बोंबाबोंब..!
सातारा: बॉम्बे रेस्टॉरंट चौकामधील उडाणपुलाखाली खडड्याच्या ठिकाणी बॅरिकेटस लावले आहेत. दुसऱ्या छायाचित्रात सातारा वाढे फाटा परिसरात सेवा रस्त्याला पडलेले मोठे खड्डे.
सातारा / ज्ञानेश्वर भोईटे यांच्याकडून:-बंगळूर महामार्गाच्या कामाची अवकाळीच्या पावसाने पोलखोल केली आहे. सहापदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नवीन रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. विशेषत: सातारा- पुणे महामार्ग हा सुरक्षा अन वेळेवर पोहोचता यावे, यासाठी आहे. पण इथं ठिकठिकाणी स्पिड कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे स्पीड ८0 च्या वर गेलं की, झापक्यान पावती येतेय घरात. जरा कुठं स्पीड गाडीने धरलं की, मध्येच धाडकन खड्डा येतोय. हा खड्डा नव्हे तर खड्डा भरुन तिथे खडबडीत उंचावट्याचा डोंगर रस्त्यावर केलाय. त्यामुळे एकवेळ स्पीड ब्रेकर परवडला. पण रस्त्यावर असलं धाडधाड..धडाम..आवाजामुळे गाडीचे शॉकऑप्सर येवू लागल्यात गळ्यात.काही वाहनधारकांनी तर केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी साहेब आम्हांला माफ करा. यापुढे जर आमच्या गाडीचा शॉकऑप्सर जर खराब झाला तर आम्ही तुमच्या विरोधात थेट न्यायालयात केस करणार आहोत. वाहनधारकांच्या या संतप्त प्रतिक्रियेचा हा व्हीडीओ सध्या सोशल मिडीयात चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डा भ्रष्टाचाराचा अड्डा न होता तो दर्जेदार होण्यासाठी वेळीच केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री यांनी ठेकेदारांना सूचना द्याव्यात, चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी अपेक्षाही यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
साताऱ्यातील सेवा रस्त्यावरील खड्डे चुकवताना अपघात होताना सातत्याने पहायला मिळत आहेत. वाढे फाटा ते खिंडवाडीपर्यंत ठिकठिकाणी सेवा रस्ते उकरले गेले आहेत. बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये पडलेल्या खड्डयात वाहने अडकू नयेत म्हणून पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेटस लावलेली आहेत. रस्त्याकडेला चिखलराडा साठला असल्याने त्यावरुनही वाहने घसरत आहेत. मागून येणाच्या वाहनाला जागा दिली तर दुचाकीचालक या चिखलमय रस्त्यावरुन घसरून पडत आहेत.
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात पुणे, शेंद्रे (सातारा) महामार्गाच्या चार पदरीकरणाचे काम करण्यात आले आहे. त्यानंतर पुढे शेंद्रे ते कागल (कोल्हापूर) असे चार पदरीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने केले. महामार्गाचे सहापदरीकरण करण्याची महत्वकांक्षी योजना केंद्र शासनाने जाहीर करुन त्यामध्ये पुणे ते शेंद्रे हा रस्ता बसविण्यात आला. पण गेल्या एक दोन वर्षापासून हा रस्ता अवकाळीच्या पहिल्याच पावसात खड्डयामुळे अवकाळा येवू लागल्याने जीवघेणा बनलाय. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे.
पुणे- सातारा महामार्गावरील कात्रज बोगद्यापासून ते सारोळा नदी तसेच सातारापर्यंत असणाऱ्या सहापदरीकरण रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या खड्डयांमधून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र, महामार्ग प्राधिकरण व रस्त्याचा ठेकेदार यांचे याकडे दुर्लक्षच असल्यामुळे वाहनधारकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होवू लागल्या आहेत. सेवा रस्त्यांची मोठी चाळण झाली आहे.
महामार्गाखाली पाणी साठू लागल्याने पाण्याच्या तळ्यातून वाहन काढताना दुचाकी चालकांना तर अक्षरश: कसरत करावी लागत आहे. सद्यस्थितीत आशियाई महामार्ग हा खडुयांचा महामार्ग झाल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे.
पुणे ते शेंद्रेपर्यंत रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. पाऊस सुरु झाल्याने महामार्गाची दुरवस्था सुरु झाली आहे. सेवा रस्त्यांसह मुख्य रस्त्यावरती आता खड्डे पडू लागले आहेत.
साताऱ्यातील खिंडवाडी, वाढे फाटा परिसरामध्ये पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी रस्त्याकडेला साठून राहत आहे. सेवा रस्ते तर खड्डयांमुळे धोकादायक बनले आहेत. या रस्त्यांवरील सखल भागात पाणी साठत असल्याने रस्त्यांची चाळण होऊ लागली आहे. या खड्ड्यांतील डांबर, खड़ी सर्वत्र पसरलेली आहे. बाहने या खड्ड्यांमध्ये आदळत असून अपघात होत आहेत.
पुणे सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ते कापूरहोळ या मार्गावरील रस्त्याचे अपूर्ण काम आहे. तसेच साताऱ्यापर्यंत येणाऱ्या मार्गातही तीच अवस्था आहे. निकृष्ट रस्त्यामुळे पाऊस झाला की, खड्डयांचा अंदाज न आल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत. या महामार्गावरील दर्जेदार रस्त्यासाठी ठिकठिकाणी टोलनाके आहेत. त्याचे टोल वाहनधारकांनी देवूनही या खड्डयांमुळे वाहनांचे नुकसान तर होतच आहे. याशिवाय वाहतूक कोंडीमुळे इच्छितस्थळी वेळेत पोहोचता येत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
पुणे सातारा महामार्गावर सुट्टीच्या दिवशी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत. महामार्ग वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून केवळ टोल नाक्यावर कारवाई करण्यात वाहतूक पोलीस मग्न असतात. मात्र, वाहतूक कोंडी झाल्यावर घटनास्थळी फिरकतदेखील नसल्याने वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कोल्हापूरनजिकच्या अपघातातून आत्मचिंतन करा
पुणे-बंगळुर आशियाई महामार्गावर कोल्हापूरजवळ अंबप फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी मुंबईला निघालेली खासगी आराम बस सोमवारी उलटली होती. या अपघातातून २५ प्रवासी सुदैवाने बचावले. अंबप फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने मुख्य रस्त्यावरुन सेवा रस्त्याकडे वाहतूक वळवली आहे. वळवलेली ही वाहतूक चालकाच्या निदर्शनाला आली नसल्याने तसेच पुढे सिमेंटचे बॅरिकेटस लावल्याने त्यांना धडकून बस उलटली. यामध्ये चालक व प्रवासी दोघे जखमी झाले होते. शेंद्रे कागल मार्गावर काम करणाऱ्या ठेकेदाराच्या उफराट्या कारभारामुळे असे अपघात नेहमीच घडत आहेत. अंबप येथील या अपघातातून यंत्रणा बोध घेणार आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
अपघातांची संख्या वाढली, वाहने झाली खिळखिळी रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या प्रक्रिया मुळातच चुकीच्या आहेत. या महामार्गावरील खडड्यात मुरुम टाकून वाहनधारकांची समजूत काढतात. हे खड्डेच अपघाताला निमंत्रण देत आहेत. या कामात वरिष्ठ अभियंता ही हे काम चुकीचे आहे. याकडे पाहत ही नाही. त्यामुळे प्रशासनाच्या यामध्ये अक्षम्य चुका दिसत आहेत. त्यामुळे ठेकेदार सबठेकेदार यांना दोषी धरण्यापेक्षा नॅशनल हायवे ॲथेरीटीच्या अधिकाऱ्यांना दोषी धरुन त्यांना निलंबीत करावे.-महारुद्र तिकुंडे, सामाजिक कार्यकर्ता, सातारा.
रस्त्याची दुरावस्था असतानाही टोल घेणे अन्यायकारक पुणे सातारा हा दर्जा नसलेला महामार्ग आहे. यामुळे अवकाळीच्या पहिल्याच पावसात लहान मोठे खड्डे पडल्याने आहे त्या रस्त्याचा नकाशाच बदलला आहे. त्यामुळे वाहने खिळखिळी होवू लागली आहेत. तरीही ठिकठिकाणी टोल वाहनधारकांकडून घेतला जातो. ही बाब वाहनधारकांसाठी अन्यायकारक आहे. अशियाई महामार्ग दर्जेदार होण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गांभीर्याने लक्ष घालून वाहनधारकांना दिलासा द्यावा. त्याचबरोबर निकृष्ट काम करणारे ठेकेदार, सब ठेकेदार आणि महामार्ग अधिकारी यांच्यावर कारवाई करावी.-सुशांत मोरे, सामाजिक कार्यकर्ता, सातारा.