single-post

शिंदे कुणाला घाबरत नाहीत आणि मैदान सोडून पळत नाहीत!’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शशिकांतजी शिंदेंचा गौरव

​'मुसाफिर हम भी हैं...' : शेरोशायरीने निरोप समारंभ झाला भावूक ( साताऱ्याच्या मातीचा वारसा : 'आम्ही दोघेही सातारचे सुपुत्र!' ​'गडी' सर्वसामान्यांचा : माथाडी कामगारांच्या लढवय्या नेत्याचा गौरव ;मैदान सोडून पळणारे आम्ही 'शिंदे' नाही!

24 March, 2026

शिंदे कुणाला घाबरत नाहीत आणि मैदान सोडून पळत नाहीत!’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शशिकांतजी शिंदेंचा गौरव

मुंबई दि.२४ मार्च 2026: सुरेश बोतालची संपादक यांच्याकडून (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):-

“शशिकांत शिंदे आणि माझा जन्म एकाच मातीतला आहे. आम्ही दोघेही साताऱ्याचे सुपुत्र आहोत, त्यामुळे आमचं नातं हे केवळ राजकीय नसून गावकी-भावकीचं आहे. साताऱ्याची माती ही माणसाला झुंज द्यायला आणि लढायला शिकवते. शशिकांतजींनी त्यांच्या कर्तृत्वातून हे सिद्ध केलंय की, ‘शिंदे किसी से डरते नही और मैदान छोड़कर भागते नही’,” अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला.

​महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या खास शैलीत शशिकांत शिंदे यांच्या राजकीय प्रवासावर आणि सातारच्या मातीशी असलेल्या नात्यावर भाष्य करत सभागृहाचे वातावरण भावूक केले.

कामगारांसाठी झुंजणारा ‘मित्रसंपन्न’ नेता

​शशिकांत शिंदे यांच्या कामाचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, कामगार चळवळ असो किंवा माथाडी कामगारांचे प्रश्न, शशिकांत शिंदे नेहमीच अग्रभागी राहिले आहेत. “सर्वसामान्यांच्या न्यायासाठी जिवाचं रान करणारा गडी अशी त्यांची ओळख आहे. सर्वसामान्यांसाठी भांडणारा नेता हीच त्यांची खरी शान आहे.” शशिकांत शिंदे यांचा मित्रपरिवार मोठा असून त्यांना ‘मित्रसंपन्न नेता’ म्हणणे अधिक समर्पक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

साताऱ्याच्या स्वाभिमानाची ठाम भूमिका

​साताऱ्यातील अलीकडील घडामोडींवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्या धाडसाचे कौतुक केले. ते म्हणाले, “काहींनी साताऱ्यातील घटनांचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला; मात्र शशिकांतजींनी आपली बाजू ठामपणे मांडली. संघर्षाच्या काळात ते कधीही डगमगले नाहीत.” शशिकांत शिंदे सध्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने सभागृहाबाहेरही त्यांचा लोकसंपर्क आणि कार्य सुरूच राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शेरोशायरीने रंगली मैफल

​आपल्या भाषणाचा शेवट उपमुख्यमंत्र्यांनी एका खास शेरने केला.

“मुसाफिर हम भी हैं, मुसाफिर तुम भी हो,

हर मोड़ पर फिर मुलाकात होती रहेगी…”


​या शेरमुळे संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून दोन सातारकरांमधील हे जिव्हाळ्याचे नाते पाहून सभागृहातील वातावरण हलकेफुलके आणि तितकेच संस्मरणीय झाले होते.