“प्रिपोल अलायन्स भाजपसोबत; मी महायुतीचाच” – आ. महेश शिंदे यांची भूमिका स्पष्ट
राष्ट्रवादीकडून नकार; भाजपसोबतच राहण्याचा निर्णय “मी महायुतीचाच” – पक्षाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीत जागावाटप निश्चित तीन-चार वेळा भेटीचा प्रयत्न; मात्र प्रतिसाद नाही प्रिपोल अलायन्सचा आधार घेत भूमिका स्पष्ट सा
22 March, 2026
सातारा : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:-
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर राजकीय वातावरण तापले असून, आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी पालकमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप करत राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
शिंदे म्हणाले, “जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीच्या बैठकीत प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघात युतीबाबत स्वतंत्र निर्णय घ्यावा, असे ठरले होते. त्यानुसार मी माझ्या मतदारसंघात शिवसेना आणि भाजप यांच्याशी चर्चा केली. मात्र राष्ट्रवादीकडून स्पष्ट नकार मिळाला.”
ते पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मतदारसंघातील सातपैकी चार जागा शिवसेना आणि तीन जागा भाजप लढवणार, असा निर्णय झाला होता. “प्रिपोल अलायन्स ज्यांच्यासोबत होता, त्यांच्यासोबत राहणे हे आमचे कर्तव्य होते. त्यामुळे आम्ही भाजपसोबत राहिलो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीसोबत जाण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगताना शिंदे म्हणाले, “आम्ही दुसऱ्या पक्षासोबत युती करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी आम्हाला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मी तीन-चार वेळा वरिष्ठ नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण भेट होऊ शकली नाही.”
दरम्यान, “आ. महेश शिंदे नेमके कुठल्या पक्षाचे?” अशी चर्चा सुरू असल्याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “मी महायुतीचाच आहे.”
महाविकास आघाडीतील शशिकांत शिंदे यांच्या भूमिकेवरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. “साताऱ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती असल्याचे कळल्यानंतर त्यांच्यासोबत जाणे योग्य वाटले नाही,” असे ते म्हणाले.
तसेच, “मी कोणतीही पक्षविरोधी कारवाई केलेली नाही. ज्या कारणांमुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले, त्यावेळची परिस्थिती आणि सध्याची साताऱ्यातील परिस्थिती यामध्ये साम्य आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पालकमंत्र्यांवर आरोप करताना शिंदे यांनी म्हटले की, “त्यांनी स्वतःचे सदस्य कैद्यांसारखे जिल्हा परिषदेत आणले. दीड महिना त्यांना कोंडून ठेवूनही ते टिकवू शकले नाहीत.” तसेच कामेश कांबळे यांना जबरदस्तीने नेण्यात आल्याचा आणि सायरन वाजवत आणल्याचा आरोपही त्यांनी केला.
या सर्व घडामोडींमुळे सातारा जिल्ह्यातील राजकारण अधिकच तापले असून, आगामी काळात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!