सातारा जिल्हा पंचायत समिती : दिग्गज नेत्यांची मोठी फौज, तरीही भाजपला सातारकरांनी नाकारले; राष्ट्रवादीचे बालेकिल्ले आजही अभेद्य
दिग्गजांची फौज मैदानात, तरीही सातारकरांचा भाजपला 'खो' ;नेते भाजपमध्ये, पण जनता विचारांशी ठाम; सातारच्या मातीचा रोखठोक कौल ; २० मार्चच्या जिल्हा परिषदेकडे लक्ष; आता 'कात्रजचा घाट' कोण दाखवणार?
17 March, 2026
सातारा जिल्हा पंचायत समिती : दिग्गज नेत्यांची मोठी फौज, तरीही भाजपला सातारकरांनी नाकारले; राष्ट्रवादीचे बालेकिल्ले आजही अभेद्य!
सातारा | दि.१७ मार्च 2026 (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):-
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नुकत्याच झालेल्या पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीच्या निकालाने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाकडे आणि महायुतीकडे नेत्यांची मोठी मांदियाळी असतानाही, सातारच्या प्रगल्भ मतदारांनी भाजपला स्पष्टपणे नाकारले असल्याचे चित्र निकालातून समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडल्याचा दावा करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत, सातारच्या स्वाभिमानी जनतेने आपली राजकीय 'अभेद्यता' कायम राखली आहे.
बड्या नेत्यांचे वलय, पण मतदारांचा 'नकार'
सातारा जिल्ह्यात आज भाजप आणि युतीकडे नेतृत्वाची मोठी फळी आहे. यामध्ये दक्षिण कराडचे आ. डॉ. अतुल भोसले, उत्तर कराडचे आ.मनोज घोरपडे, माण-खटावचे ना. जयकुमार गोरे, सातारचे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, तर फलटणचे या.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी मातब्बर मंडळी कार्यरत आहेत. अगदी कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे शिवसेनेत असले तरी, त्यांच्या पत्नी सौ. प्रियाताई शिंदे या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष असून तेथील सर्व कार्यकर्ते भाजपसाठी झटत आहे.
एवढी मोठी 'रथी-महारथींची' फौज मैदानात असतानाही भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागणे, हे भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. दुसरीकडे, विरोधात केवळआ मंत्री मकरंद आबा पाटील, मंत्री शंभूराजे देसाई,आ.शशिकांत शिंदे आणि आ. बाळासाहेब पाटील असे मोजकेच नेतृत्व असतानाही राष्ट्रवादीने आपले गड राखले आहेत. याचाच अर्थ, सातारच्या जनतेने भाजपच्या विस्ताराला स्पष्टपणे रोखले आहे.
पुरोगामी विचारांचा 'पहारा'; भाजपला यश मिळवणे कठीणच!
सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अणाभाऊ साठे आणि यशवंतराव चव्हाण यांच्या क्रांतीकारी विचारांचा वारसा जपणारा जिल्हा आहे. येथील जनता राजकीयदृष्ट्या अत्यंत हुशार असून, ती प्रस्थापितांच्या विरोधात उभी राहण्यात कधीही मागे हटत नाही. नेते जरी भाजपमध्ये गेले असले, तरी सामान्य जनता आणि येथील मतदार हा भाजपच्या विचारधारेला सहजासहजी स्वीकारत नाही, हे १००% सत्य या निकालांनी अधोरेखित केले आहे.
राजकीय संदेश : 'सातारकर कुणाचेही गुलाम नाहीत'
या निकालांकडे लोकशाहीच्या विजयाच्या नजरेतून पाहणे गरजेचे आहे:
- मतदारांची प्रगल्भता: सातारच्या जनतेने हे दाखवून दिले आहे की, केवळ नेत्यांच्या प्रभावाखाली येऊन ते मतदान करत नाहीत.
- बालेकिल्ला अभेद्य: राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे भाजपचे स्वप्न सातारकरांनी धुळीस मिळवले आहे.
- नव्या समीकरणांची नांदी: या निकालांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, आगामी निवडणुकांमध्ये भाजपला अधिक कडव्या संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेकडे सर्वांचे लक्ष!
आता सर्वांचे लक्ष २० मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीकडे लागले आहे. पंचायत समितीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, भाजपचा करिष्मा साताऱ्यात फारसा चाललेला नाही. सातारच्या मातीत 'कात्रजचा घाट' दाखवण्याची परंपरा आहे आणि येथील लोक सहजासहजी शांत बसत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेचा खरा 'कॅप्टन' कोण ठरणार आणि राष्ट्रवादी-शिवसेना युती कशी बाजी मारणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!