सातारा जिल्हा परिषदेत नूतन पदाधिकाऱ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी; इमारतीच्या सुशोभीकरण अन् दुरुस्तीला वेग
२० मार्चला होणार नूतन पदाधिकाऱ्यांची निवड; केबिन, अँटीचेंबर अन् सभागृहांच्या दुरुस्तीला वेग;शिक्षण विभागातील पडझडीनंतर प्रशासन सतर्क; केवळ मलमपट्टी नको, दर्जेदार कामावरच भर;युद्धपातळीवर रंगरंगोटी अन् 'पीओपी'; नव्या शिलेदारांच्या स्वागतासाठी सातारा जिल्हा
17 March, 2026
सातारा जिल्हा परिषदेत नूतन पदाधिकाऱ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी; इमारतीच्या सुशोभीकरण अन् दुरुस्तीला वेग
सातारा | दि.१७ मार्च 2026 (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):-
सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया येत्या २० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत सध्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणाच्या कामांनी चांगलाच वेग घेतला आहे. आगामी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विविध विषय समित्यांचे सभापती यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाले असून, युद्धपातळीवर इमारतीचा कायापालट केला जात आहे.
केबिन आणि सभागृहांची रंगरंगोटी
नूतन पदाधिकाऱ्यांच्या कार्यभार स्वीकारासाठी आवश्यक असलेल्या केबिन, अँटीचेंबर आणि मुख्य सभागृहांची स्वच्छता व दुरुस्ती झपाट्याने सुरू आहे. इमारतीतील अनेक दालनांमध्ये सध्या रंगकाम, पीओपी (POP) आणि विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. विशेषतः सभागृह व चेंबर परिसराला नवा लूक देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, येणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी एक प्रसन्न आणि सुसज्ज प्रशासकीय वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.
कामाच्या दर्जावर विशेष लक्ष
काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाच्या अँटीचेंबरचा काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेतून धडा घेत बांधकाम विभागाने यंदा दुरुस्तीच्या कामात गुणवत्तेशी तडजोड न करण्याचा निर्धार केला आहे. केवळ वरवरची मलमपट्टी न करता कामे टिकाऊ आणि दर्जेदार व्हावीत, यासाठी कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
अभियंता की ठेकेदार? जबाबदारीवरून चर्चा
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अभियंते नेहमीच दर्जेदार कामासाठी आग्रही असतात. मात्र, अनेकदा ठेकेदारांकडून नफेखोरीसाठी किंवा अतिघाईमुळे कामाचा दर्जा खालावतो. अशावेळी त्याचे खापर संबंधित अभियंता किंवा उपअभियंत्यांवर फोडले जाते. परंतु, प्रत्यक्ष साईटवर देखरेख करणाऱ्या यंत्रणेने कामाची गुणवत्ता वेळीच तपासल्यास असे प्रकार टाळता येतील, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
नूतन पदाधिकारी आपल्या विभागाचा पदभार स्वीकारणार असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. प्रशासकीय कामात गतिमानता येण्यासाठी नवीन नेतृत्वाचे आगमन महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान, ज्या तत्परतेने सध्या सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत, त्याच तत्परतेने सर्वसामान्य नागरिकांची कामेही मार्गी लागावीत, अशी अपेक्षा सातारकरांतून व्यक्त होत आहे.
पारदर्शकतेची अपेक्षा
जिल्हा परिषदेच्या कामकाजात गुणवत्ता, उत्तरदायित्व आणि लोकहित या त्रिसूत्रीला प्राधान्य दिल्यास प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल. सध्या सुरू असलेली कामे पारदर्शक पद्धतीने पूर्ण होत आहेत, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहेत.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!