'आर्टी'च्या व्यवस्थापकीय संचालकपदी सुनील वारे; पदभार स्वीकारताच विकासाचा 'रोडमॅप' तयार करण्याचे संकेत
'आर्टी'च्या इतिहासात प्रथमच पूर्णवेळ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती. पदभार स्वीकारताच सुनील वारे ॲक्शन मोडमध्ये; विभागांचा घेतला सविस्तर आढावा. मातंग समाजाच्या विकासासाठी लवकरच ठरणार नवा 'रोडमॅप'.
15 March, 2026
'आर्टी'च्या व्यवस्थापकीय संचालकपदी सुनील वारे; पदभार स्वीकारताच विकासाचा 'रोडमॅप' तयार करण्याचे संकेत
पुणे :दि.१५ मार्च २०२६( जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालकपदी भारतीय रेल्वे लेखा सेवेतील (IRAS) ज्येष्ठ अधिकारी सुनील वारे यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला. संस्थेच्या स्थापनेनंतर प्रथमच एका पूर्णवेळ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती झाल्याने, 'आर्टी'च्या कार्याला आता मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महापुरुषांना अभिवादन करून कार्यारंभ
पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनील वारे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संस्थेच्या निबंधक इंदिरा अस्वार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
'व्हिजन' आणि 'मिशन'वर भर
कार्यभार हाती घेताच वारे यांनी तातडीने संस्थेच्या सर्व विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. "आर्टीच्या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण आणि समाजाभिमुख उपक्रमांना अधिक प्रभावीपणे राबवले जाईल," असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मातंग आणि तत्सम समाजघटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एक ठोस विकास आराखडा (Roadmap) तयार करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. संस्थेचे स्पष्ट 'व्हिजन' आणि 'मिशन' निश्चित करून कामाला गती देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
अनुभवाचा शिदोरी
सुनील वारे हे सन २००० च्या बॅचचे आयआरएएस (IRAS) अधिकारी असून, त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी त्यांनी पुण्याच्या 'बार्टी' (BARTI) संस्थेत महासंचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात बार्टीच्या अनेक योजनांना नवी दिशा मिळाली होती, तोच अनुभव आता 'आर्टी'च्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवसभरात विविध सामाजिक क्षेत्रांतील कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी वारे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!