single-post

जावळी पंचायत समितीवर भाजपचा झेंडा! राष्ट्रवादीच्या 'तटस्थ' भूमिकेमुळे सत्तेचे समीकरण फिरले

सौरभ शिंदे सभापती, तर गोरख महाडिक यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; राजकीय वर्तुळात खळबळबळ

16 March, 2026

जावळी पंचायत समितीवर भाजपचा झेंडा! राष्ट्रवादीच्या 'तटस्थ' भूमिकेमुळे सत्तेचे समीकरण फिरले

सौरभ शिंदे सभापती, तर गोरख महाडिक यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; राजकीय वर्तुळात खळबळबळ

मेढा | दि.१६ मार्च 2026 (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा): जावळी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत अनपेक्षित घडामोडी घडल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याने मतदानात तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने भाजपला सत्ता काबीज करण्यात यश आले आहे. या धक्कादायक निकालामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली आहे.

असे रंगले सत्तेचे नाट्य

​नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीनंतर कुडाळ (भाजप - सौरभ शिंदे), सायगाव (भाजप - सौ. चारुशीला पवार), खर्शी-बारामुरे (भाजप - गोरख महाडिक) असे भाजपचे तीन बलाबल होते. तर म्हसवे गणातून राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) सौ. शिल्पा शिंदे, कुसुंबीतून सौ. सुनिता दुंदळे आणि आंबेघरमधून अतीश कदम (शिवसेना) निवडून आले होते.

निवड प्रक्रिया आणि निकाल:

  • सभापती पद: भाजपचे सौरभ शिंदे विरूद्ध शिवसेना-मित्रपक्षांच्या सौ. सुनिता दुंदळे यांच्यात लढत झाली. मतदानात शिंदे यांना ३ मते मिळाली, तर दुंदळे यांना २ मते मिळाली.
  • राष्ट्रवादीचा 'हात' कुणाला?: राष्ट्रवादीच्या सदस्य सौ. शिल्पा शिंदे यांनी मतदानावेळी तटस्थ राहणे पसंत केले. परिणामी, भाजपचे पारडे जड होऊन सौरभ शिंदे विजयी झाले.
  • उपसभापती पद: या पदासाठी गोरख महाडिक (भाजप) आणि सुनिता दुंदळे (शिवसेना) यांनी अर्ज भरले होते. मात्र, दुंदळे यांनी माघार घेतल्याने गोरख महाडिक यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

मतदारांमध्ये संताप; 'जनतेच्या न्यायालयात' जाणार?

​भाजपला रोखण्यासाठी मतदान केलेल्या म्हसवे गणातील मतदारांनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. "आम्ही ज्या विचाराने मतदान केले, त्याच्या अगदी उलट घडल्याने हा मतदारांचा विश्वासघात आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या प्रकरणावरून आता जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याची मागणी जोर धरत आहे.

जुने गड कोसळले!

​जावळी पंचायत समितीच्या स्थापनेपासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, यंदा एका सदस्याच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आली असून भाजपने आपला वरचश्मा निर्माण केला आहे. दरम्यान, ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या अतीश कदम यांना संधी का नाकारण्यात आली, यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांमधून होत आहे.

नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत

निवडीनंतर जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, जयश्रीताई गिरी, सौ. श्वेता शिंदे आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे अभिनंदन केले. पिठासन अधिकारी राजश्री मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. यावेळी तहसीलदार प्रविण मुगदुल आणि गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील उपस्थित होते.