कोरेगाव शहरात लवकर अण्णाभाऊ साठें यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आंदोलनाचा इशारा
दोन वर्षांपासून पाठपुरावा; नगरपंचायतीने तातडीने प्रस्ताव पाठवण्याची- सुरेश बोतालजी यांची मागणी
14 March, 2026
कोरेगाव शहरात लवकर अण्णाभाऊ साठें यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आंदोलनाचा इशारा
दोन वर्षांपासून पाठपुरावा; नगरपंचायतीने तातडीने प्रस्ताव पाठवण्याची- सुरेश बोतालजी यांची मागणी
कोरेगाव | दि.१३ मार्च २०२६ (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा) :
लोकशाहीर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी कोरेगाव नगरपंचायतीकडे गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याचा आरोप करत, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरेश बोतालजी यांनी लवकरात लवकर पुतळा उभारण्याची मागणी केली आहे. नगरपंचायतीने यावर तातडीने कार्यवाही न केल्यास कोरेगाव शहरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बोतालजी दिला आहे.
भारतीय हिंदू महासंघ, लोक पॅंथर, भारतीय बहुजन सेना आणि रिपब्लिकन समता पार्टीचे संस्थापक-अध्यक्ष असलेल्या सुरेश बोतालजी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरेगाव शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभा राहावा, ही जनभावना आहे. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र, नगरपंचायत प्रशासनाकडून अद्याप केवळ आश्वासनेच मिळत असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
प्रशासनाने जागेची पाहणी करावी
पुतळा उभारणीसाठी आम्ही जुना मोटर स्टॅन्ड, आजचा जळगाव नाका, अण्णाभाऊ साठे नगर, विशिष्ट जागा सुचवलेली आहे. नगरपंचायतीने आपल्या अखत्यारित असलेल्या शासकीय जागांची तातडीने पाहणी करावी आणि संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने योग्य जागेची निवड करून पुतळा उभारणीचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर मंजुरीसाठी पाठवावा, अशी आग्रही मागणी बोतालजी यांनी केली आहे.
आमदारांच्या आश्वासनानंतरही स्थिती ‘जैसे थे’
या संदर्भात कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनाही काही दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी आमदारांनी जागेची पाहणी करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप प्रत्यक्ष पाहणी किंवा प्रक्रियेला गती मिळालेली नाही असे बोतालजी यांनी म्हटले आहे.
आंदोलन विस्ताराचा इशारा
पुतळा उभारणीबाबत येत्या दोन ते तीन महिन्यांत ठोस निर्णय न झाल्यास प्रथम कोरेगाव शहर पातळीवर आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर हे आंदोलन तालुका आणि जिल्हा स्तरावर व्यापक केले जाईल. या आंदोलनामुळे उद्भभवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी नगरपंचायत प्रशासन, संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी जबाबदार राहतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!