single-post

माथाडी कामगारांवरील अन्यायाविरोधात नवी मुंबईत भव्य मोर्चा

समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा; मंडळ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपावर कामगारांचा संताप

13 March, 2026

 नवी मुंबईत माथाडी कामगारांवरील अन्यायाविरोधात नवी मुंबईत भव्य मोर्चा!

नवी मुंबई, दि. १३ :(जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):-

किराणा बाजार व दुकाने मंडळ तसेच मुंबई भाजीपाला बाजार असंरक्षित कामगार मंडळातील कामगारांच्या कामकाजात मंडळ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने माथाडी भवन ते फळ मार्केट येथील मंडळाच्या कार्यालयावर शुक्रवारी (दि. १३) दुपारी भव्य मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाचे नेतृत्व माथाडी कामगार नेते, संघटनेचे सरचिटणीस व माजी आमदार Narendra Annasaheb Patil तसेच संघटनेचे कार्याध्यक्ष व आमदार Shashikant Shinde यांनी केले. या मोर्चात संघटनेचे पदाधिकारी आणि माथाडी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान उपस्थित कामगारांना संबोधित करताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत माथाडी कामगारांच्या कार्यक्षेत्रात काही बोगस टोळ्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. मंडळातील काही अधिकारी, पोलीस यंत्रणा तसेच मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेली ही भ्रष्ट साखळी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

माथाडी कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उभी राहिलेली ही ऐतिहासिक चळवळ आजही कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत आहे. मात्र अत्यल्प सभासद असलेल्या काही संघटनांच्या दबावामुळे मंडळातील काही अधिकारी कामगारांच्या कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप करत असल्यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या हस्तक्षेपामुळे व प्रशासनातील भ्रष्ट साखळीमुळे माथाडी कामगारांच्या रोजगारावर आणि उपजीविकेवर परिणाम होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

शासनाने या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढला नाही, तर महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आजचा मोर्चा हा केवळ इशारा असून शासनाने याची वरिष्ठ पातळीवर तातडीने दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, या संदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चा घडवून आणण्यासाठी निवेदन देण्यात आले असून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच किराणा बाजार व दुकाने मंडळ तसेच मुंबई भाजीपाला बाजार असंरक्षित कामगार मंडळाला निवेदन देऊन जाब विचारण्यात आला असून याबाबत आठ दिवसांच्या आत लेखी उत्तर देण्याचे मंडळाने मान्य केल्याची माहितीही देण्यात आली.

या मोर्चात संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख, दिलीप खोंड यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.