मसुरीच्या 'LBSNAA'मध्ये सातारा पॅटर्नचा डंका! शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक भरारीची देशातील भावी प्रशासकांसमोर मांडणी
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे IAS अधिकाऱ्यांना विशेष मार्गदर्शन
20 August, 2026
जरंडेश्वर समाचार
सातारा दि.२० जरंडेश्वर समाचार वृत्त जनससेवा :-
शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक झेप घेणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या यशाची गाथा आता देशातील सर्वोच्च प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत पोहोचली आहे. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA), मसुरी येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) २०२६ बॅचच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी आयोजित विशेष प्रशिक्षण सत्रात सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक परिवर्तनाचा 'पॅटर्न' मुख्य मार्गदर्शक म्हणून मांडण्यात आला.
मसुरी येथे पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम (फेज-१) अंतर्गत ११ ऑगस्ट २०२६ रोजी “Improving Outcomes in School Education” या विषयावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती याशनी नागराजन (भा.प्र.से.) यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सातारा जिल्ह्याने शिक्षण क्षेत्रात केलेल्या आमूलाग्र बदलांचा आणि अंमलबजावणीचा प्रत्यक्ष अनुभव देशातील भावी सनदी अधिकाऱ्यांसमोर मांडला.
१५४ व्या स्थानावरून थेट देशात १० व्या क्रमांकावर!
साताऱ्याने शिक्षण क्षेत्रात केलेली कामगिरी अत्यंत उल्लेखनीय ठरली आहे. राष्ट्रीय स्तरावरील 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स' (PGI) मध्ये वर्ष २०२२ मध्ये १५४ व्या क्रमांकावर असलेला सातारा जिल्हा, प्रशासकीय नियोजन व सामूहिक प्रयत्नांमुळे २०२५ मध्ये थेट राष्ट्रीय स्तरावर १० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. केवळ तीन वर्षांत १४४ क्रमांकांची ऐतिहासिक झेप घेत साताऱ्याने देशातील सर्वोत्तम १० जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवले असून, राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
परिवर्तनाची प्रमुख सूत्रे :
प्रशिक्षण सत्रात श्रीमती याशनी नागराजन यांनी साताऱ्याच्या या यशामागील मुख्य धोरणे स्पष्ट केली:
गुणवत्ता सुधार व क्षमता बांधणी: शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण आणि आधुनिक अध्यापन पद्धतींचा वापर.
डिजिटल शिक्षण: शाळांमध्ये तंत्रज्ञान व डिजिटल साधनांचा प्रभावी वापर.
पायाभूत सुविधा व CSR: सीएसआर (CSR) निधीचा सुयोग्य वापर करून शाळांच्या पायाभूत सुविधांचा कायापालट.
लोकसहभाग: स्थानिक समुदाय, पालक आणि प्रशासनाचा समन्वय.
"देशातील केवळ १९ जिल्ह्यांचा 'उत्तम' श्रेणीत समावेश असून त्यात साताऱ्याने स्थान मिळवले आहे. १५४ वरून १० व्या क्रमांकापर्यंतचा हा प्रवास केवळ आकडेवारीतील सुधारणा नसून लोकप्रतिनिधी, प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे."
— श्रीमती याशनी नागराजन (CEO, जिल्हा परिषद, सातारा)
साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
देशाचे धोरण ठरवणाऱ्या आणि अंमलबजावणी करणाऱ्या भावी आयएएस अधिकाऱ्यांसमोर साताऱ्याचे मॉडेल सादरीकरणासाठी निवडले जाणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरली आहे. साताऱ्याच्या शैक्षणिक क्रांतीची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली गेल्याचे यावरून सिद्ध झाले आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय