विडणी उत्तरपत्रिका प्रकरणाचे गुपित फुटले; परीक्षकाचा 'तो' प्रताप नडला, मानधन जप्त!
दहावीच्या १२५ उत्तरपत्रिकांची तज्ज्ञांकडून पुन्हा तपासणी; कोल्हापूर विभागीय मंडळाची मोठी कारवाई
15 March, 2026
विडणी उत्तरपत्रिका प्रकरणाचे गुपित फुटले; परीक्षकाचा 'तो' प्रताप नडला, मानधन जप्त!
दहावीच्या १२५ उत्तरपत्रिकांची तज्ज्ञांकडून पुन्हा तपासणी; कोल्हापूर विभागीय मंडळाची मोठी कारवाई
फलटण | दि.१५ मार्च २०२६ (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाने फलटण तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमधील उत्तरपत्रिका प्रकरणाचा छडा लावला आहे. दहावीचे पेपर सहावीच्या मुलींनी तपासल्याच्या गाजत असलेल्या तक्रारीत तथ्य नसले, तरी उत्तरपत्रिकांसारख्या अत्यंत गोपनीय कागदपत्रांशी खेळ केल्याप्रकरणी संबंधित परीक्षकावर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दोषी परीक्षकाचे संपूर्ण मानधन जप्त करण्यात आले असून, संस्थेला त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाईचे आदेश दिले आहेत.
नेमके प्रकरण काय?
फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या दहावीच्या परीक्षेदरम्यान विडणी केंद्रावर गैरप्रकार होत असल्याची तक्रार शाळेचे शिपाई मंगेश अभंग यांनी केली होती. यात मराठीचे परीक्षक वैभव शेंडे यांनी सहावीच्या विद्यार्थिनींकडून उत्तरपत्रिका तपासून घेतल्याचा, तर शिक्षक धनाजी नेरकर हे संशयास्पद हालचाली करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
चौकशीत काय निष्पन्न झाले?
मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि सचिव सुभाष चौगुले यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत द्विसदस्यीय समितीमार्फत प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन सीसीटीव्ही फुटेज आणि जबाबांची तपासणी केली. तपासात समोर आले की:
- रेषा ओढण्याचे काम विद्यार्थिनींकडे: परीक्षार्थींनी उत्तरपत्रिकेत कोरी सोडलेली पाने खोडण्यासाठी लाल शाईने 'रेषा' मारण्याचे काम शेंडे यांनी दोन लहान मुलींकडून करून घेतले होते. नियमानुसार हे काम परीक्षकाने स्वतः करणे बंधनकारक असताना, त्यांनी गोपनीयतेचा भंग करत उत्तरपत्रिका अनधिकृत व्यक्तींच्या हाती दिल्या.
- गुणदान सुरक्षित: प्रत्यक्ष तपासणीत विद्यार्थिनींनी केवळ रेषा मारल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांनी पेपर तपासले नसल्याचे सिद्ध झाले आहे.
- हिंदी शिक्षकांवरील आरोप फोल: सीसीटीव्ही फुटेजमध्ये शिक्षक धनाजी नेरकर हे पेपर सुरू होण्यापूर्वीच (सकाळी १०:५२ वाजता) केंद्र सोडून गेल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावरील आरोप निराधार ठरले आहेत.
१२५ उत्तरपत्रिकांची फेरतपासणी
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि पालकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी विभागीय मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वैभव शेंडे यांनी तपासलेल्या सर्व १२५ उत्तरपत्रिका आता तज्ज्ञ नियामकांमार्फत पुन्हा तपासल्या जाणार आहेत. "विद्यार्थ्यांच्या एका गुणाचेही नुकसान होऊ दिले जाणार नाही," अशी ग्वाही मंडळाने दिली आहे.
कठोर कारवाईचा इशारा
"उत्तरपत्रिकांची गोपनीयता हा परीक्षेचा कणा आहे. यात हलगर्जीपणा करणाऱ्या परीक्षकाचे मानधन जप्त केले असून, संबंधित संस्थेला त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यास सांगितले आहे. भविष्यात अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत."
— राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, कोल्हापूर विभागीय मंडळ.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!