दहावी-बारावी परीक्षा कामकाजाबाबत सातारा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
कोल्हापूर विभागीय मंडळाची कारवाई; तीन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश
13 March, 2026
सातारा : दि.१३मार्च२०२६(जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत कार्यरत असलेल्या कोल्हापूर विभागीय मंडळ यांनी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या प्रमाणपत्र परीक्षांच्या कामकाजासंदर्भात सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधित नोटीस १२ मार्च २०२६ रोजी विभागीय मंडळाकडून जारी करण्यात आली आहे.
या नोटीसमध्ये परीक्षा कामकाजाच्या संदर्भात काही प्रशासकीय बाबींमध्ये दिरंगाई व निर्देशांचे पालन न झाल्याची नोंद घेण्यात आली असून, त्याबाबत तीन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
नोटीसनुसार परीक्षा केंद्रांवरील परिरक्षकांची माहिती तसेच परीक्षा केंद्रसंचालकांची माहिती सादर करण्यात विलंब झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच राज्य शासनाच्या “कॉपीमुक्त अभियान” अंतर्गत परीक्षा केंद्रांमध्ये CCTV कॅमेरे बसविण्याच्या अंमलबजावणीबाबत अपेक्षित प्रयत्न दिसून आले नाहीत, असेही मंडळाने निरीक्षण नोंदविले आहे.
याशिवाय, परीक्षेसंदर्भात आयोजित ऑनलाईन बैठकींना संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित न राहता अधिनस्त अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगितल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. परीक्षा संदर्भातील तक्रारींच्या निपटाऱ्याबाबतही योग्य व तातडीची कार्यवाही झाल्याचे दिसून आले नाही, असे मंडळाचे म्हणणे आहे.
फलटण तालुक्यातील विडणी येथील एका तक्रारीच्या संदर्भात विभागीय अध्यक्षांकडून फोन व संदेशाद्वारे सूचना देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले असून त्या अनुषंगाने चौकशी प्रक्रियेत विलंब झाल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात सुभाष रा. चौगुले, विभागीय सचिव, कोल्हापूर विभागीय मंडळ यांनी संबंधित नोटीस जारी केली असून महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार पुढील कारवाई प्रस्तावित का करू नये, याबाबत शिक्षणाधिकारी यांनी लेखी खुलासा सादर करावा, असे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, नोटीसची प्रत जिल्हाधिकारी सातारा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, राज्य मंडळाचे सचिव पुणे तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांनाही पाठविण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!