सातारा: शाहू चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा तात्काळ बसवा-किशोर गालफाडे
कला संचालनालयाने पुतळा कलात्मकदृष्ट्या योग्य ठरवला; समाजबांधवांची नगरपरिषदेकडे मागणी दोन-तीन वर्षांपासून प्रलंबित प्रश्न; विलंब झाल्यास आंदोलनाचा इशारा, तज्ञ समितीची पाहणी पूर्ण; बहुजन समाजाची प्रशासनाकडे तातडीची मागणी; अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याबाबत ग
13 March, 2026
सातारा: शाहू चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा तात्काळ बसवा!-किशोर गालफाडे
सातारा :दि.१३ मार्च २०२६(जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):-
सातारा शहरातील शाहू चौक येथे उभारण्यात येत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर Annabhau Sathe यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून तो तात्काळ बसविण्यात यावा, अशी मागणी किशोर गालफाडे सामाजिक कार्यकर्ते व मातंग समाज बांधव तसेच आंबेडकरी चळवळीतील बहुजन समाजबांधवांनी सातारा नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
समाजबांधवांनी दिलेल्या निवेदनानुसार, सातारा शहरातील शाहू चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम सन २०२२–२३ पासून सुरू झाले होते. या कामामध्ये पूर्वीचा अर्धाकृती पुतळा हटविणे, परिसराचे सुशोभीकरण करणे तसेच नवीन पूर्णाकृती पुतळा उभारणे या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विविध विभागांची परवानगी घेण्याची आवश्यकता होती. त्यामुळे या प्रक्रियेला सुमारे दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागला.
पुतळा तयार करताना समितीतील काही सदस्यांनी त्यामध्ये असलेल्या त्रुटींबाबत सूचना केल्या होत्या. त्या सर्व सूचना संबंधित कंपनीकडून पूर्ण करण्यात आल्या आहेत. पुतळ्याच्या कामामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते अशा सुमारे १५ ते १६ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या सूचनांनुसार पुतळ्याचे काम करण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या कला संचालनालयाने दि. २१ जुलै २०२५ रोजी दिलेल्या पत्रानुसार या पुतळ्याची तज्ञांकडून पाहणी करण्यात आली असून पुतळा कलात्मक दृष्ट्या योग्य असून उभारण्यासाठी सुस्थितीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या पुतळ्याच्या मॉडेलची मान्यता नूतनीकरण करून देण्यात आली असल्याचेही पत्रात नमूद आहे.
तथापि, दि. १२ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा पुतळा योग्य नसून पुन्हा तयार करावा, अशी मागणी केल्याने समाजबांधवांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यामुळेच समाजाच्या वतीने पुन्हा एकदा नगरपरिषदेला निवेदन देऊन पुतळा तात्काळ बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत ऑल इंडिया पँथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही निवेदन देत सांगितले की, प्रारंभी गैरसमजुतीमुळे पुतळ्याबाबत हरकत घेण्यात आली होती. मात्र कला संचालनालयाचा अहवाल पाहिल्यानंतर पुतळा योग्य प्रकारे तयार झाल्याची खात्री पटली असून आता पुतळा बसविण्यास आमच्या संघटनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
समाजबांधवांनी निवेदनात पुढे इशारा दिला आहे की, शाहू चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा तात्काळ बसवून जनतेची अनेक वर्षांची अपेक्षा पूर्ण करावी. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. तसेच गरज पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.यावेळी सागर भिसे, तानाजी बेडेकर, उमेश चव्हाण,किशोर गालफाडे, विजय कांबळे, आदित्य गायकवाड,आदिल शेख, संदीप माने मुस्लिम बांधव व सर्व मातंग समाज व बहुजन समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते .
या निवेदनावर किशोर गालफाडे सामाजिक कार्यकर्ते, सागर भिसे, तानाजी बेडेकर, उमेश चव्हाण,किशोर गालफाडे, विजय कांबळे, आदित्य गायकवाड,आदिल शेख,,संदीप माने , सचिन वायदंडे, अमोल पाटोळे, कांतीलाल कांबळे, डॉ. रमाकांत साठे, उमेश चव्हाण, संदीप माने, मनोज मिठापुरे, विक्रम कानडे, वैभव गवळी यांच्यासह अनेक समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!