अंभेरी वनक्षेत्रात वणवा लावणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या; १० हेक्टर जंगल जळून खाक
वनविभागाची धडक कारवाई; भारतीय वन अधिनियमान्वये गुन्हा दाखल, सातारा जिल्ह्यात खळबळ
11 March, 2026
अंभेरी वनक्षेत्रात वणवा लावणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या; १० हेक्टर जंगल जळून खाक
वनविभागाची धडक कारवाई; भारतीय वन अधिनियमान्वये गुन्हा दाखल, सातारा जिल्ह्यात खळबळ
कोरेगाव | (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):
कोरेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या अंभेरी येथील राखीव वनक्षेत्रात वणवा लावून वनसंपत्तीचे नुकसान करणाऱ्या संशयित आरोपीला वनविभागाने तातडीने अटक केली आहे. मौजे अंभेरी येथील फॉ.कं. नं. २१६ मध्ये ही घटना घडली असून, याप्रकरणी गणेश राजाराम जातक (रा. अंभेरी, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आगीत सुमारे १० हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले आहे.
१० हेक्टरवर आगीचे तांडव
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी अंभेरी येथील वनक्षेत्रात अचानक आग लागली होती. वाऱ्याच्या वेगामुळे या आगीने रौद्र रूप धारण केले होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जीवाची बाजी लावून हा वणवा नियंत्रणात आणला. मात्र, तोपर्यंत मौल्यवान झाडे, गवत आणि जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार १० हेक्टर क्षेत्र या वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.
संशयितावर कडक कारवाई
वणव्याच्या घटनेनंतर वनविभागाने सखोल तपास चक्रे फिरवली. तपासाअंती गणेश जातक याने ही आग लावल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वनविभागाने त्याला जेरबंद करून त्याच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६ (१) (ब) (फ) अंतर्गत प्र.गु.रि. क्र. ०१/२०२६ नुसार गुन्हा नोंदवला आहे. या कायद्यानुसार दोषी आढळल्यास एक वर्षापर्यंत कारावास किंवा ५,००० रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते (भा.व.से.), सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव (रोहयो व वन्यजीव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे (प्रा.), वनपाल शिवाजी लटके आणि वनरक्षक रानबा बिक्कड (एकंबे) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
"वनसंपत्तीचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अवैध वृक्षतोड, शिकार, अतिक्रमण किंवा वणवा लावणे हे गंभीर गुन्हे आहेत. असे प्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे."
— वनपरिक्षेत्र कार्यालय, कोरेगाव

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!