single-post

सावधान! शेतातील बांध पेटवला अन् वणवा लागला तर थेट कोठडी; कोरेगाव वनविभागाचा इशारा

अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार | वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगदाळे यांचे आवाहन

06 March, 2026

सावधान! शेतातील बांध पेटवला अन् वणवा लागला तर थेट कोठडी; कोरेगाव वनविभागाचा इशारा

अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार | वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगदाळे यांचे आवाहन

कोरेगाव:दि. ६ मार्च २०२६ (जरंडेश्वर समाचार वृत्तजनसेवा):-उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने वनसंपत्तीला वणव्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. शेतातील पालापाचोळा किंवा बांध जाळताना होणाऱ्या निष्काळजीपणामुळे जंगलात वणवा लागल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हा गुन्हा अजामीनपात्र असून दोषींना कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असा सज्जड इशारा कोरेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगदाळे यांनी दिला आहे.

पूर्वपरवानगी बंधनकारक

उन्हाळ्यात अनेक शेतकरी मशागतीसाठी शेतातील बांध पेटवतात. मात्र, ही आग अनेकदा नियंत्रणाबाहेर जाऊन लगतच्या वनक्षेत्रात पसरते. यामुळे मौल्यवान वनसंपत्तीसह वन्यजीवांचाही बळी जातो. हे टाळण्यासाठी शेतातील बांध पेटवण्यापूर्वी संबंधित वनविभाग कार्यालयाशी संपर्क साधून अधिकृत नोटीस किंवा पूर्वपरवानगी घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

काय आहे कायदा?

वणवा लावणाऱ्या व्यक्तीविरुद्ध 'भारतीय वन अधिनियम १९२७' अंतर्गत कलम २६ (१)(B) व २६ (१)(C) नुसार वनगुन्हा नोंदविण्यात येईल. कलम ६५-अ नुसार हा गुन्हा अजामीनपात्र आहे. यामध्ये दोषी आढळल्यास:

  • एक वर्षापर्यंत कारावास
  • पाच हजार रुपयांपर्यंत दंड
  • नुकसान भरपाईची वसुली अशा कडक तरतुदी आहेत.

सहकार्याचे आवाहन

"वणवा रोखा – वन वाचवा – भविष्य सुरक्षित ठेवा" असा संदेश देत, नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी वनसंपत्तीचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे मानून वनविभागाला सहकार्य करावे. कुठेही वणवा लागल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जगदाळे यांनी केले आहे.