आरक्षण उपवर्गीकरणासाठी दिल्लीत घुमणार ‘मातंग आक्रोश’; २३ मार्चला जंतर-मंतरवर महामोर्चा!
डॉ. मच्छिंद्र सकटे यांचा इशारा: मातंग समाजाच्या अस्मितेचा लढा आता निर्णायक टप्प्यावर
28 February, 2026
कराड : २८ फेब्रुवारी 2026( जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा)
अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी येत्या २३ मार्च रोजी देशाची राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर ऐतिहासिक ‘मातंग आक्रोश मोर्चा’ धडकणार आहे. "हा केवळ मोर्चा नसून मातंग समाजाच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील लाखो समाजबांधवांनी या महामोर्चात सहभागी व्हावे," असे आवाहन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
डॉ. सकटे पुढे म्हणाले की, अनुसूचित जातीसाठी असलेल्या १३ टक्के आरक्षणामध्ये ५९ जातींचा समावेश आहे. मात्र, आरक्षणाचे लाभ काही ठराविक प्रभावी जातींकडेच केंद्रित होत असून, मातंग समाजासारखे घटक आजही वंचितेचे जीवन जगत आहेत. गेल्या तीन दशकांपासून प्रलंबित असलेला उपवर्गीकरणाचा प्रश्न आता तडीस नेण्यासाठी दिल्लीत शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मातंग समाजाचा इतका मोठा मोर्चा दिल्लीत जात असून, या निमित्ताने समाजाची एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे.
या मोर्चाद्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ जाहीर करावे, अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा आणि बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारे आरक्षण लाटणाऱ्यांवर जन्मठेपेची तरतूद करावी, अशा प्रमुख मागण्या केंद्र सरकारकडे केल्या जाणार आहेत. यावेळी प्रकाश वायदंडे, सुरज घोलप, रामभाऊ दाभाडे, संजय तडाके, रामभाऊ सातपुते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय