सातारा जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष तीव्र; 'सत्ता स्थापने'च्या भूमिकेत शिवसेना-राष्ट्रवादी ..!
राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येणार? नव्या समीकरणांची साताऱ्यात चर्चा ;
14 February, 2026
सातारा जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष तीव्र; 'सत्ता स्थापने'च्या भूमिकेत शिवसेना-राष्ट्रवादी..!
सातारा | प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकीय आखाड्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या गोटात बैठकांचे सत्र सुरू झाले असून, जिल्ह्याचे राजकारण आता 'भाजपला बाजूला ठेवून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापने'च्या वळणावर येऊन ठेपले आहे.
बलाबल आणि बहुमताचा पेच
एकूण ६५ जागा असलेल्या सातारा जिल्हा परिषदेत सत्तेसाठी ३३ हा जादूई आकडा गाठणे आवश्यक आहे. मात्र, निकालानंतर कोणाकडेही स्पष्ट बहुमत नाही:
- भाजप: २७ जागा
- राष्ट्रवादी + स्वाभिमानी: २१ जागा
- शिवसेना: १५ जागा
- काँग्रेस व अपक्ष: प्रत्येकी १ जागा
भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, सत्तेसाठी त्यांना शिवसेना किंवा राष्ट्रवादीपैकी एकाच्या पाठिंब्याची अनिवार्य गरज आहे.
भाजपची आज बैठक साताऱ्यात 'रणनीती'पण भाजप ला विरोधी बाकावर बसावे लागेल..!
नूतन सदस्यांचा सत्कार आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी भाजपची महत्त्वाची बैठक आज, शनिवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि मकरंद देशपांडे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. भाजप सत्तेचा दावा ठोकण्यासाठी कोणत्या पक्षाशी हातमिळवणी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी व शिवसेनेची सावध पवित्रा
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपापल्या नूतन सदस्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन 'मोर्चेबांधणी' सुरू केली आहे.
- राष्ट्रवादी: मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गट नोंदणीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
- शिवसेना: पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सदस्यांना मार्गदर्शन करत पक्षाच्या 'व्हीप'चे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. शिवसेनेने आपला सविस्तर अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला असून, अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.
भाजपाला सोबत घेतल्यास"राजकीय पक्षांचे अस्तित्व धोक्यात येईल?" – कार्यकर्त्यांचा भाजपला विरोध
जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सध्या एक वेगळाच सूर उमटत आहे. अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या मते, भाजपला सत्तेत सहभागी करून घेतल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जिल्ह्यातील स्वतंत्र अस्तित्व संपू शकते. "जे जे प्रादेशिक पक्ष भाजपसोबत गेले, ते संपले," असा दाखला देत कार्यकर्त्यांनी नेत्यांवर दबाव वाढवला असल्याचे समजते आहे.
स्थानिक चर्चा: भाजपला बाजूला सारून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करावी, अशी मागणी जोर धरत आहे. "सत्तेसाठी तडजोड करण्यापेक्षा स्वाभिमानाची भूमिका घ्या," असा संदेश कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना दिला आहे.
महायुतीचे समीकरण साताऱ्यात लागू होणार नाही
राज्यातील महायुतीचे समीकरण साताऱ्यात लागू होणार की स्थानिक नेते कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढे झुकून नवे समीकरण (राष्ट्रवादी+शिवसेना+काँग्रेस) जुळवणार? याचा फैसला येत्या काही दिवसांत वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतरच होईल. पण साताऱ्यात भाजपाने स्वतंत्र भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत, आता युतीची गरज भाजीपाप का भासत आहे, वेळेनुसार राजकारण येथून पुढच्या काळामध्ये चालणार नाही असा कार्यकर्त्यांचा चर्चा चालू आहे, एकंदरीत भाजपाला सातारा जिल्ह्याच्या सत्तेमधून बाहेर राहावे लागेल अशी तर आज मात्र चर्चा कार्यकर्त्यांच्या सुरू असल्याचे दिसून येत आहे, भाजपची आजची बैठक निवडलेले कार्यकर्ते सत्कार सोहळा आहे एवढेच बाकी काही नाही.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय