कोरेगावला मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची तातडीची गरज; सामाजिक कार्यकर्ते सुरेश बोतालजी यांची राज्य सरकारकडे मागणी*
३०० कोटींच्या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मितीला चालना;ग्रामीण भागाला मिळणार मल्टी स्पेशालिटी सुविधा
25 February, 2026
कोरेगाव,दि.२५ (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा) – तालुक्यातील वाढती लोकसंख्या, अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि उपचारासाठी बाहेरगावी जावे लागणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरेगाव शहरात सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरेश बोतालजी यांनी केली आहे.
ही मागणी त्यांनी विद्यमान यांच्याकडे प्रत्यक्ष निवेदनाद्वारे मांडली होती. तसेच पत्रकार दिनाच्या निमित्तानेही या विषयाचा पुनरुच्चार करण्यात आला होता. मात्र, अद्याप या मागणीवर कोणतीही ठोस कार्यवाही झाल्याचे दिसत नसल्याने आपण ही मागणी राज्य सरकारी करत आहोत.
रुग्णांची परवड; बाहेरगावी उपचारांची वेळ
कोरेगाव तालुक्यातील गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना उपचारासाठी पुणे, मुंबई किंवा कराड येथे जावे लागते. अपघात, हृदयरोग, मेंदूविकार, कर्करोग किंवा प्रसूतीसारख्या तातडीच्या प्रकरणांमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर याचा मोठा ताण पडत आहे.
सध्या तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालये कार्यरत असली तरी अत्याधुनिक यंत्रसामग्री, तज्ञ डॉक्टर आणि आयसीयू सुविधा नसल्यामुळे गंभीर रुग्णांना त्वरित रेफर करावे लागते. त्यामुळे “गोल्डन अवर”मध्ये उपचार मिळण्याची संधी अनेकदा हुकते.
कोरेगाव – मध्यवर्ती व सोयीस्कर ठिकाण
कोरेगाव हे सातारा जिल्ह्यातील मध्यवर्ती तालुक्याचे ठिकाण असून येथील भौगोलिक स्थान, उपलब्ध शासकीय जागा आणि वाहतुकीची सुविधा लक्षात घेता येथे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणे शक्य असल्याचे बोतालजी यांनी नमूद केले आहे. या रुग्णालयात हृदयरोग, न्यूरो, ट्रॉमा केअर, कर्करोग, मातृत्व व बालरोग, डायलिसिस, अत्याधुनिक तपासणी केंद्र अशा सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
लोकहिताचा प्रश्न; राजकीय इच्छाशक्तीची गरज
ही मागणी केवळ राजकीय नसून लोकहिताचा आणि मानवी हक्कांचा प्रश्न असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे. ३०० कोटींच्या या प्रकल्पामुळे केवळ कोरेगाव नव्हे तर आसपासच्या खेड्यांतील हजारो रुग्णांना दिलासा मिळेल. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि आरोग्य सुविधा ग्रामीण भागात पोहोचतील.
शासनाने पुढाकार घ्यावा
राज्य सरकारने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी सुरेश बोतालजी यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनी एकत्र येत हा विषय विधानसभेत मांडावा आणि निधीची तरतूद करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोरेगावसारख्या वाढत्या तालुक्याला अत्याधुनिक आरोग्य सुविधा देणे ही काळाची गरज असून, “आरोग्य हाच खरा विकास” या भूमिकेतून शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय