single-post

झेडपीचा कौल: आकड्यांच्या पलीकडचं 'सातारी' राजकारण

साताऱ्याचा गड: कमळ फुललं, पण गणितं हुकली. ​उदयनराजेंची 'एन्ट्री' रोखणे भाजपला पडले महागात.आता खरी 'फिल्डिंग': अध्यक्षपदासाठी फोडाफोडी की तडजोड? ​त्रिशंकू अवस्था: सत्तेची चावी आता कुणाच्या हाती?

10 February, 2026

झेडपीचा कौल: आकड्यांच्या पलीकडचं 'सातारी' राजकारण

​सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल म्हणजे केवळ जय-पराजयाची आकडेवारी नाही, तर तो जिल्ह्याच्या बदलत्या राजकीय मानसिकतेचा आरसा आहे. ६५ जागांच्या या रणसंग्रामात भाजपने २७ जागांसह ‘सर्वात मोठा पक्ष’ होण्याचा मान मिळवला खरा, पण सत्तेसाठी लागणारा ३३ चा ‘मॅजिक फिगर’ गाठता आला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि मित्रपक्षांनी मिळून सत्तेची चावी आपल्याकडे खेचून घेतली आहे. या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, राजकारणात ‘बळ’ आणि ‘युक्ती’ यांचा मेळ बसला नाही, तर विजयाचं गणित कसं चुकतं.

भाजपचा अति-आत्मविश्वास नडला?

​भाजपच्या पराभवाचे किंवा सत्तेपासून दूर राहण्याचे विश्लेषण करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे स्थानिक समीकरणांकडे झालेले दुर्लक्ष. केवळ संघटनात्मक ताकदीवर निवडणूक जिंकता येते, हा भ्रम मतदारांनी मोडून काढला. विशेषतः खा. उदयनराजे भोसले यांना निर्णयप्रक्रियेत बाजूला ठेवणे साताऱ्यासारख्या संवेदनशील तालुक्यात भाजपला महागात पडले. कोरेगाव, वाई, खंडाळा आणि पाटणमध्ये भाजपची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. जिथे विजय आवाक्यात होता, तिथे कार्यकर्त्यांची मने जुळली नाहीत आणि मतांचे विभाजन झाले.

समन्वयाची 'महा'शक्ती

​या निवडणुकीचा सर्वात मोठा 'टेक-अवे' म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेने दाखवलेली एकी. कार्यकर्त्यांनी वरच्या पातळीवरील हेवेदावे बाजूला ठेवून जमिनीवर ‘समन्वय’ साधला. कोरेगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आल्याने भाजपच्या गणितांना सुरुंग लागला. वाईमधील राष्ट्रवादीची मुसंडी आणि पाटणमधील शिवसेनेचा बुलंद झालेला आवाज हे याच रणनीतीचे यश आहे.

प्रस्थापितांना मतदारांचा 'रामराम'

​यावेळच्या निकालाने अनेक मातब्बरांना जमिनीवर आणले आहे. देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, प्राची पाटील यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव हा मतदारांनी दिलेला स्पष्ट इशारा आहे. घराणेशाही आणि पदाच्या प्रभावापेक्षा 'कामगिरी' आणि 'लोकसंपर्क' महत्त्वाचा आहे, हे सातारच्या जनतेने दाखवून दिले.

तालुकानिहाय चित्र आणि सत्तेचा पेच

​पंचायत समित्यांच्या निकालांकडे पाहिले तर सातारा, कराड आणि खटावमध्ये भाजपने वर्चस्व राखले असले, तरी खंडाळा, कोरेगाव, वाईमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. माण, फलटण आणि जावलीसारख्या ठिकाणी समसमान बलाबल असल्याने आता खऱ्या अर्थाने 'घोडेबाजार' किंवा राजकीय खेळींना वेग येईल. विशेषतः कोरेगावमध्ये आ. महेश शिंदे आणि आ. शशिकांत शिंदे यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढाईत राष्ट्रवादीने मारलेली बाजी ही संघटनात्मक बांधणीचा विजय मानला पाहिजे.

 बदलाचे वारे..!

​आता सर्वांचे लक्ष अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे लागले आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याचा नैतिक दावा करेल, पण अंकगणित मात्र आघाडीच्या बाजूने झुकलेले आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह आणि अपक्षांची भूमिका यात निर्णायक ठरेल.

​या निकालाचा सारांश इतकाच— सातारच्या मतदाराने कोणत्याही एका पक्षाला सरसकट सत्ता दिलेली नाही. पक्षापेक्षा उमेदवार आणि त्याच्या कामाला महत्त्व देणारा हा 'परिपक्व कौल' आहे. राजकीय पक्षांसाठी यात एकच धडा आहे: "अंतर्गत राजकारण सोडा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडा." अन्यथा...!