ऐतिहासिक क्षण: सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; राजभवनात घेतला शपथविधी ;अर्थखाते राष्ट्रवादीला न मिळाल्याने चर्चांना उधाण; सुनेत्रा पवारांकडे 'उत्पादन शुल्क', तर 'तिजोरी' मुख्यमंत्र्यांच्याच ताब्यात!अजितदादांच्या वारशाची नवी कस
राष्ट्रवादीची फिल्डिंग फेल; 'अर्थ'पूर्ण नियोजनात भाजपचीच सरशी. सुनेत्रा वहिनींची एन्ट्री दमदार, पण 'तिजोरी'च्या चाव्या मुख्यमंत्र्यांकडेच.
31 January, 2026
ऐतिहासिक क्षण: सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; राजभवनात घेतला शपथविधी
मुंबई | ३१ जानेवारी २०२६ (जरंडेश्वर समाचार):-
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एका सुवर्ण अध्यायाची नोंद झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवन येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली.
राजकीय पार्श्वभूमी आणि नियुक्ती
२८ जानेवारी २०२६ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. या संकटकाळात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विधिमंडळ पक्षाने सुनेत्रा पवार यांच्यावर विश्वास दर्शवत त्यांची नेतेपदी एकमताने निवड केली. या नियुक्तीमुळे राज्याला ६४ वर्षांच्या इतिहासात पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाली आहे.
शपथविधी सोहळा
आज सकाळी राजभवनात झालेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी शपथ घेण्यापूर्वी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा सादर केला.
शपथविधीनंतर माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांनी भावूक होत सांगितले की, "अजित दादांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणे हीच माझी प्राथमिकता असेल." मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करत, "हा महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाचा एक मोठा टप्पा आहे," असे गौरवोद्गार काढले.
राज्याच्या राजकारणात अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तर घेतली, मात्र सत्तेच्या सारीपाटात राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या 'अर्थ' खात्याने हुलकावणी दिली आहे. दादांची ओळख असलेल्या अर्थ व नियोजन खात्याची धुरा आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.
सत्ता समीकरणांत 'अर्थ' बदलला!
गेल्या अनेक दशकांपासून राज्याची 'तिजोरी' आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे अतूट नाते राहिले आहे. मग ते आघाडी सरकारमधील जयंत पाटील, सुनील तटकरे असोत किंवा महाविकास आघाडी आणि महायुतीमधील स्वतः अजित पवार. अर्थ खाते म्हणजे 'दादांचा बालेकिल्ला' असे समीकरणच रूढ झाले होते. मात्र, आजच्या खातेवाटपाने या समीकरणाला सुरुंग लावला आहे.
नव्या उपमुख्यमंत्र्यांकडे कोणती जबाबदारी?
राज्याच्या ११ व्या उपमुख्यमंत्री ठरलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे खालील खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे:
- राज्य उत्पादन शुल्क (Excise)
- क्रीडा व युवक कल्याण
- अल्पसंख्याक विकास
दुसरीकडे, अत्यंत कळीची मानली जाणारी अर्थ आणि नियोजन ही दोन्ही खाती मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवून सत्तेचे रिमोट कंट्रोल आपल्या हातात असल्याचे संकेत दिले आहेत.
अन् राष्ट्रवादीची 'फिल्डिंग' ठरली फेल...
पक्षात छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यासारखे मातब्बर आणि अनुभवी नेते असतानाही, भाजपने अर्थ खाते आपल्याकडेच ठेवण्याचा पवित्रा घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीने हे खाते मिळवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, मात्र महायुतीतील आगामी राजकीय गणिते आणि वर्चस्ववाद पाहता भाजपने नमते घेतले नाही.
राजकीय विश्लेषकांचे मत:
"अर्थ खाते हे केवळ बजेट सादर करण्याचे साधन नसून, राज्याच्या विकासनिधीवर नियंत्रण मिळवण्याचे मुख्य केंद्र आहे. हे खाते राष्ट्रवादीकडून काढून घेणे, हा महायुतीमधील शक्ती संतुलनाचा नवा प्रयोग असू शकतो."
चर्चा तर होणारच!
सुनेत्रा पवार यांच्याकडे दिलेली खाती सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची असली, तरी 'दादां'चा वारसा सांगणाऱ्या पक्षाला अर्थ खात्याशिवाय राहावे लागणे, ही बाब कार्यकर्त्यांच्या पचनी पडणे थोडे कठीण जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या खातेवाटपाचा महायुतीच्या अंतर्गत समन्वयावर काय परिणाम होतो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय