जिल्हा परिषद–पंचायत समित्यांत राष्ट्रवादीला यश मिळण्याची शक्यता ?
अजितदादा पवारांविषयीची 'भावनिक लाट'
30 January, 2026
राज्यात जिल्हा परिषद–पंचायत समित्यांत राष्ट्रवादीला मोठ यश मिळण्याची शक्यता..!
अजितदादा पवारांविषयीची जनतेमध्ये 'भावनिक लाट'
पुणे/सातारा : जरंडेश्वर समाचार वृत्तसेवा
राज्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर निर्माण झालेली तीव्र जनभावना सध्याच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी होणाऱ्या श्रद्धांजली सभा आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. राज्यात आणि सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळण्याची शक्यता..!
श्रद्धांजलीची भावना निवडणूक चित्र बदलणार?
अजितदादा पवार यांच्याविषयी जनतेमध्ये असलेली आपुलकी आणि कामाचा उरक त्यांच्या निधनानंतर प्रकर्षाने अधोरेखित झाला आहे. अनेक शहरांसह ग्रामीण भागात कोणत्याही आवाहनाशिवाय पाळले गेलेले कडक बंद जनतेच्या मनातील त्यांच्या स्थानाची साक्ष देत आहेत. "अजितदादा हे केवळ नेते नव्हते, तर प्रशासनावर पकड असलेला लोकनेता होता," अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. याच भावनिक लाटेचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक मतदार ही निवडणूक अजितदादांना 'भावपूर्ण श्रद्धांजली' म्हणून पाहतील, असे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.
ग्रामीण मतदारांचा कल आणि वाढता असंतोष..!
महागाई, बेरोजगारी आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव यांमुळे ग्रामीण भागात आधीच अस्वस्थता आहे. त्यातच रखडलेली विकासकामे आणि पाणीटंचाई यांसारख्या स्थानिक प्रश्नांवरून सत्ताधारी भाजपाविरोधात नाराजीचा सूर असल्याचे काही भागांतून समोर येत आहे. या असंतोषाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटित स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू असून, स्थानिक प्रश्नांवर थेट संवाद साधण्यावर भर दिला जात आहे.
सातारा जिल्ह्यात 'राष्ट्रवादी'ची पकड अधिक मजबूत?
सहकार आणि पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद आजही भक्कम आहे. अजितदादांच्या जाण्याने जिल्ह्यात "घरातील हक्काचा माणूस" गेल्याची भावना निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती पातळीवर कार्यकर्ते कमालीचे सक्रिय झाले असून, या भावनिक लाटेचा फायदा पक्षाला होण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे, भाजपातील अंतर्गत मतभेद आणि उमेदवारीवरून असलेली नाराजी पक्षासाठी अडचणीची ठरू शकते. ग्रामीण मतदार सध्या "दिल्ली-मुंबईपेक्षा गावचा विकास" करणाऱ्या नेतृत्वाला अधिक पसंती देताना दिसत आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय