निर्णयांचा ‘दादा’ माणूस गेला... पण राज्याचे प्रश्न आजही उत्तरांच्या प्रतीक्षेत!
पदापेक्षा कामाला महत्त्व देणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा!
30 January, 2026
निर्णयांचा ‘दादा’ माणूस गेला... पण राज्याचे प्रश्न आजही उत्तरांच्या प्रतीक्षेत!
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चेहरे येतात आणि जातात. काही केवळ पदांच्या खुर्चीत बसून काळ घालवतात, तर काही आपल्या जाहीरनाम्यातील शब्दांच्या बुडबुड्यांत हरवून जातात. पण, अजितदादा पवार हे अशा मोजक्या नेत्यांपैकी एक होते, ज्यांची ओळख शब्दांनी नाही, तर त्यांच्या कामाच्या 'सुपरफास्ट' वेगाने निर्माण झाली होती. त्यांच्या जाण्याने राज्याने केवळ एक उपमुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री गमावलेला नाही, तर फाईलवर सही करण्याची हिंमत असलेला एक कणखर प्रशासक गमावला आहे.
“सामान्य माणसाला काय मिळणार?”—हाच अंतिम निकष
मंत्रिमंडळाच्या बैठकीत जेव्हा एखादा मोठा प्रस्ताव यायचा, तेव्हा दादांचा पहिला प्रश्न ठरलेला असायचा— “हे सगळं ठीक आहे, पण याचा सामान्य माणसाला नेमका काय उपयोग?” राजकारण आणि समाजकारण यांतील अंतर कमी करणारा हा प्रश्न त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा केंद्रबिंदू होता. त्यांनी कधीही लोकप्रियतेसाठी घोषणांची खैरात केली नाही; उलट, 'जे शक्य आहे तेच सांगणार आणि जे सांगणार ते करूनच दाखवणार' हा त्यांचा बाणा होता.
नियोजनाचा आणि शिस्तीचा 'मास्तर'
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना याचे उत्तम उदाहरण. राजकारणात घोषणा करणे सोपे असते, पण ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागणारी आर्थिक शिस्त केवळ अजितदादांकडे होती. निधीचे नियोजन, अंमलबजावणीची यंत्रणा आणि योजनेचे सातत्य यांचा त्यांनी केलेला सूक्ष्म अभ्यास हे सिद्ध करतो की, ते केवळ आकड्यांशी खेळणारे अर्थमंत्री नव्हते, तर समाजाच्या शेवटच्या घटकाची गरज ओळखणारे जाणते नेतृत्व होते.
“निधी देतोय, आता काम वेळेत पूर्ण झालंच पाहिजे!”
हा त्यांचा शब्द म्हणजे अधिकाऱ्यांसाठी कडक शिस्तीचा डोस असायचा. जलसंपदा असो वा ऊर्जा विभाग, वर्षानुवर्षे कागदावर अडकलेले प्रकल्प मार्गी लावण्याची किमया त्यांनी साधली.
कठोर स्वभाव, पण मृदू हेतू
अनेकांना त्यांचा स्वभाव फटकळ वाटायचा, त्यांचे शब्द टोचणारे असायचे. पण त्या शब्दांमागे राज्याचं भलं व्हावं हीच तळमळ असायची. बेशिस्त, कामचुकारपणा आणि फाईली रेंगाळत ठेवणे त्यांच्या रक्तातच नव्हते. वेळेचे भान कसे असावे, हे त्यांनी स्वतःच्या वागण्यातून प्रशासनाला शिकवले. पहाटेच्या वेळी कामाला सुरुवात करून रात्री उशिरापर्यंत फाईलींचा निपटारा करणारा असा 'वर्कहोलिक' नेता पुन्हा होणे कठीण आहे.
राजकीय सभ्यतेची उंची
टीका आणि आरोप-प्रत्यारोप राजकारणात नवे नाहीत. दादांवरही टीका झाली, पण त्यांनी कधीही आपली पातळी घसरू दिली नाही. संकट काळात ते कधीही डगमगले नाहीत; उलट अधिक शांत आणि ठामपणे संकटाचा सामना केला. त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेली जनसागर आणि लोकांच्या डोळ्यांतील अश्रू हेच सांगतात की, जनतेने त्यांना त्यांच्या पदासाठी नाही, तर त्यांनी केलेल्या कामासाठी मनात जागा दिली होती.
उरलेले प्रश्न आणि दादांची आठवण
आज ते आपल्यात नाहीत, पण राज्यापुढील आव्हाने संपलेली नाहीत. शेतीचे संकट, पाण्याचा प्रश्न आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या आघाड्यांवर आजही ठोस निर्णयांची गरज आहे. अशा वेळी निर्णय घेणाऱ्या आणि ते अमलात आणणाऱ्या खमक्या नेतृत्वाची उणीव प्रकर्षाने जाणवते.
नेते येतात आणि जातात; पण अजितदादांनी घालून दिलेली कामाची शिस्त आणि निर्णयांची दिशा जर आपण पुढे नेली, तर तीच त्यांना खऱ्या अर्थाने दिलेली श्रद्धांजली ठरेल. अजितदादा गेले असले, तरी विकासाची जी मोजपट्टी त्यांनी तयार केली आहे, ती महाराष्ट्रासाठी सदैव मार्गदर्शक ठरेल.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय