single-post

निष्ठावंत कार्यकर्त्याचा श्वास गुदमरतोय; सातारा जिल्ह्या च्या मातीत 'घराणेशाही' निवडणुकीत!

कर्तृत्वाला साथ द्या: सामान्य घरातील सक्षम कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.

25 January, 2026

राजकीय विशेष वार्तापत्र

निष्ठावंत कार्यकर्त्याचा श्वास गुदमरतोय; सातारा जिल्ह्या च्या मातीत 'घराणेशाही' निवडणूकीत!

सातारा | जरंडेश्वर समाचार 

सातारा जिल्हा... छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे,क्रांतीसिंह नाना पाटील आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लाभलेली ही भूमी. संतांच्या आणि क्रांतिकारकांच्या या जिल्ह्यात आज एक 'विचित्र शांतता' पसरली आहे. ही शांतता समाधानाची नसून, वर्षानुवर्षे पक्षासाठी रक्त आटवणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनात धुमसणाऱ्या असंतोषाची आहे. सातारच्या राजकीय मातीत आता विकासाच्या चर्चेपेक्षा 'घराणेशाहीच्या गळफासाची' चर्चा अधिक गडद होऊ लागली आहे.अशी चर्चा सातारा जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या मध्ये रंगू लागली आहे.

तालुक्या-तालुक्यात सत्तेची 'जहागिरी'

​कराडपासून फलटणपर्यंत आणि कोरेगावपासून पाटणपर्यंत, जिल्ह्याचा राजकीय नकाशा पाहिला तर लोकशाहीचे विदारक चित्र समोर येते. प्रत्येक तालुक्यात काही ठराविक घराण्यांनी सत्तेवर आपली पकड घट्ट केली आहे. "नेत्याचा मुलगाच नेता" या अलिखित नियमामुळे सामान्य कुटुंबातील कर्तृत्ववान कार्यकर्त्यांचे पंख छाटले जात आहेत.

​नेत्यांच्या सभेसाठी गर्दी जमवणारा, 'साहेब-साहेब' म्हणून घोषणा देणारा आणि रात्रंदिवस सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता नेत्यांना हवा असतो. मात्र, जेव्हा सत्तेची पदे किंवा उमेदवारी वाटपाची वेळ येते, तेव्हा मात्र कार्यकर्त्यांना बाजूला सारून नेत्यांच्या घरातले 'पाळणे' हलू लागतात. हा लोकशाहीचा उत्सव आहे की प्रस्थापित घराण्यांचा 'राज्याभिषेक'? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

खोक्यांच्या पुढे निष्ठेची होरपळ

​आज साताऱ्याच्या राजकारणात 'निष्ठा' हा शब्द केवळ भाषणांपुरता उरला आहे. निवडणुकीच्या रिंगणात आता पैशांचा उघड 'नंगानाच' सुरू आहे. ज्या कार्यकर्त्याकडे जनसंपर्क आहे, अभ्यासू वृत्ती आहे, पण खिशात 'खोके' नाहीत, त्याला सरळ नाकारले जाते. "निवडणूक ही विचारांची नाही, तर पैशांच्या ताकदीची लढाई आहे," असे चित्र प्रस्थापितांनी जाणीवपूर्वक निर्माण केले आहे. यामुळे समाजसेवेची ओढ असलेला सामान्य तरुण हतबल झाला आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता, या दुष्टचक्रात सामान्य कार्यकर्त्याचे राजकीय भविष्य धोक्यात आले आहे.

असुरक्षिततेपोटी निष्ठावंतांना संधी नाकारली जात आहे का?

​सामान्य कार्यकर्ता जर मोठा झाला, तर तो उद्या आपल्याच वारसांना आव्हान देईल, अशी भीती आजच्या प्रस्थापित नेत्यांना वाटू लागली आहे. याच असुरक्षिततेपोटी निष्ठावंतांना संधी नाकारली जाते. राजकारणाचे बाळकडू घरातच मिळते, असा समज करून घेतलेल्या या वारसांना जनतेच्या तळागाळातील प्रश्नांची जाण किती, हा मोठा प्रश्न आहे. ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक असून, यामुळे केवळ काही ठराविक घराण्यांचीच संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढत आहे.

आता प्रबोधन आणि संघर्षाची वेळ!

​सातारच्या स्वाभिमानी जनतेनो आणि कार्यकर्त्यांनो, आता विचार करण्याची वेळ आली आहे. जर आज आपण गप्प बसलो, तर पुढची पिढी या प्रस्थापितांची 'वेठबिगार' म्हणून ओळखली जाईल. लोकशाही वाचवण्यासाठी आता 'राजकीय क्रांती' अनिवार्य आहे:

  • घराणेशाहीची साखळी तोडा: केवळ 'वारस' म्हणून मिळणाऱ्या उमेदवारीला नाकारा.
  • कर्तृत्वाला साथ द्या: सामान्य घरातील सक्षम कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.
  • स्वाभिमान जागा करा: नेत्यांच्या नावाचा उदो-उदो करण्यापेक्षा आपल्या हक्कासाठी आवाज उठवा.

वेळ निघून जाण्यापूर्वी जागृत व्हा! सातारच्या मातीने देशाला 'प्रतिसरकार' देऊन क्रांती शिकवली आहे. आता हीच माती घराणेशाहीच्या भिंती पाडून 'जनतेची सत्ता' दारात आणेल, हीच अपेक्षा आहे.