साताऱ्याचा आक्रोश: सातारा जिल्ह्यात गुन्हेगारांची वाढली दहशत!
साताऱ्यात 'खाकी'ची दहशत संपली का? रस्त्यावर सांडणारे रक्त आणि प्रशासनाचे थंड मौन!सर्वसामान्यांचे जीणे सुसह्य की असह्य? घराबाहेर पडताना सातारकरांच्या पोटात गोळा!
23 January, 2026
साताऱ्याचा आक्रोश: सातारा जिल्ह्यात गुन्हेगारांची वाढली दहशत!
लेखक: सुरेश बोतालजी, पत्रकार
सातारा: 'शांत आणि सुसंस्कृत सातारा' ही जिल्ह्याची ओळख आज पुसली जाताना दिसतेय. छत्रपतींच्या या पावन भूमीत आज तलवारी आणि कोयत्यांचा नंगानाच उघड्या डोळ्यांनी पहावा लागत आहे. कायद्याचा धाक संपला की गुन्हेगारांचे मनोबल वाढते आणि साताऱ्यात नेमके हेच चित्र भयावह पद्धतीने समोर येत आहे. दिवसाढवळ्या होणारे खून, ऊस कामगारांच्या हत्या आणि गल्लीबोळात चालणारे टोळीयुद्ध यामुळे आज संपूर्ण जिल्हा दहशतीच्या छायेत वावरत आहे.
कायद्याची राखरांगोळी आणि व्यवस्थेचे मौन
अलीकडेच एका ऊसतोड कामगाराचा दिवसाढवळ्या खून झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो मजूर केवळ एक मृतदेह नव्हता, तर तो साताऱ्याच्या ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचा जिवंत पुरावा होता. कष्टकऱ्यांचे रक्त रस्त्यावर सांडते आणि गुन्हेगार मोकाट फिरतात, हे कोणत्या सुदृढ समाजाचे लक्षण आहे? किरकोळ वादातून थेट प्राण घेण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जाते, याचाच अर्थ असा की त्यांना पोलिसांचा आणि कायद्याचा विसर पडला आहे.
राजकीय वरदहस्त: गुन्हेगारीचे मूळ
जिल्ह्यात आज 'दोन नंबरचे धंदे' करणाऱ्यांची चांदी आहे. वाळू उपसा, मटका, अवैध दारू आणि जमीन बळकावणे यातून आलेला काळा पैसा आणि त्याला मिळणारे राजकीय पाठबळ यामुळे गुन्हेगारी फोफावतेय. वाढदिवस आणि जयंत्यांच्या नावाखाली चालणारा उन्माद, हातात शस्त्रे घेऊन काढल्या जाणाऱ्या मिरवणुका हे सर्व पाहून सामान्य माणसाने जगायचे कसे? गुन्हेगार आणि राजकीय नेते यांच्यातील 'साटेलोटे' आज जिल्ह्याच्या मुळावर येत आहे.
पोलीस यंत्रणा: दहशत नेमकी कुणाची?
पोलीस प्रशासनाचा दरारा गुन्हेगारांवर असायला हवा, पण आज सातारकर जनताच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. गुन्ह्यांचा तपास संथ गतीने होणे किंवा राजकीय दबावापोटी ठोस कारवाई टाळणे, यामुळे जनतेचा विश्वास उडाला आहे. पोलिसांची मैत्री गुन्हेगारांशी की जनतेशी? याचे उत्तर आता कागदावर नाही तर कृतीतून मिळणे अपेक्षित आहे.
सर्वसामान्यांचे जगणे झाले असह्य!
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे आणि दहशतीमुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन पूर्णपणे असह्य झाले आहे. संध्याकाळी घराबाहेर पडताना भीती वाटते, मुलांच्या भविष्याची चिंता सतावते. "आपल्याला काय त्याचे?" ही वृत्ती ठेवून आता गप्प बसून चालणार नाही. ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही, तर ही एक सामाजिक आपत्ती आहे. जर आज आपण आवाज उठवला नाही, तर उद्याचा बळी आपल्याच घरातील कोणीतरी असू शकतो
साताऱ्याला पुन्हा 'सुसंस्कृत' आणि 'सुरक्षित' करायचे असेल, तर गुन्हेगारांवर 'झिरो टॉलरन्स' धोरण राबवावे लागेल. राजकीय हस्तक्षेप झुगारून पोलिसांनी आपली 'खाकी'ची ताकद दाखवून द्यावी. अन्यथा, साताऱ्याचा इतिहास शौर्याचा होता, पण भविष्य मात्र भयावह असेल.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय