single-post

सातारा–पुणे–कोल्हापूर जिल्ह्यांतील बेकायदेशीर टोलवसुलीवर कारवाई करावी -अशोक गायकवाड जिल्हाध्यक्ष आरपीआय ची मागणी

करार कालावधी संपला तरी टोल वसुली सुरूच;रस्त्यांची दुरवस्था, पावती न देता रोज कोट्यवधींची वसुली; “नो सर्विस, नो टोल” तत्त्वानुसार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागू करण्याची मागणी

25 September, 2025

सातारा दि.२५(जरंडेश्वर समाचार) सातारा – पुणे – कोल्हापूर जिल्ह्यांमधील काही राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील टोल नाक्यांवर सुरू असलेली वसुली बेकायदेशीर असून, ती तत्काळ बंद करून संबंधिताच्या वर कारवाई करावी, अशी मागणी अशोक गायकवाड जिल्हाध्यक्ष आर पी आय सातारा  यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), तसेच सातारा आणि पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, काही टोल नाक्यांवर वाहनधारकांकडून पावती न देता मोठ्या प्रमाणावर रक्कम वसूल केली जाते. अनेक ठिकाणी करारकालावधी संपूनही वसुली सुरू असल्याचे दिसून येते. तसेच रस्त्यांची स्थिती अत्यंत निकृष्ट असून खड्डे, अडथळे व देखभाल नसल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956 आणि National Highways Fee Rules 2008 नुसार टोल वसुली केवळ सेवा उपलब्ध असताना करता येते. अलीकडील सर्वोच्च न्यायालयाच्या NHAI vs O. J. Janeesh या प्रकरणातील निर्णयानुसार “नो सर्विस, नो टोल” हे तत्त्व स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आले आहे.

अशोक बापू गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात  काही मागण्या केल्या आहेत.

बेकायदेशीर टोल वसुली तात्काळ थांबवावी.

टोल नाक्यांचा करारकालावधी, सेवा व देखभाल यांची तपासणी करावी.

करार संपल्यास नवीन करार पारदर्शक पद्धतीने करावा.

वाहतूक नियंत्रण, डिजिटल तिकिट प्रणाली, CCTV देखरेख यासारख्या सुविधा सुनिश्चित कराव्यात.

बेकायदेशीर वसुली झाल्यास ती रक्कम वाहनधारकांना परत द्यावी.

दोषींवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, जर तात्काळ कारवाई झाली नाही तर नागरिकांच्या हितासाठी आंदोलन करण्यात येईल. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्याची जबाबदारी प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाची असेल.

या निवेदनाची प्रत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही पाठविण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी म्हटले  आहे.